बुधवार, १० सप्टेंबर, २०१४

 शिक्षक दिनाच्या निमित्ताने


दिनांक ५ सप्टेंबर २०१४ रोजी फेसबुकच्या माझ्या वालवर टाकलेले पोस्ट

१९५६मध्ये माझ्या शिक्षणाचा श्रीगणेशा बुलढाणा जिल्ह्यातील नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक ६, खामगावमध्ये झाला. तेव्हापासून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत आईची ममता देणारे शिक्षक मला मिळाले. इयत्ता पहिलीत प्रमाणभाषेपेक्षाही वऱ्हाडी आणि हिंदीचा मुक्तपणे वापर करणाऱ्या तायडेगुरुजींमुळे आम्हांला शाळेत परकेपणा कधी जाणवलाच नाही. कृष्णाष्टमीच्या वेळी कृष्ण आणि वृंदावन यांच्या, पोळ्याच्या वेळी बैलाच्या मातीच्या मूर्ती आणि ज्वारीच्या धांड्याच्या बैलगाड्या, दिवाळीत मातीचे किल्ले, पाटीवरची चित्रे, भाषिक कोडी अशा गोष्टींवर त्यांचा भर असायचा. एकदा प्रत्येक विद्यार्थ्याने एकेक भाषिक कोडे (उखाणा) आपल्या आईकडून शिकून वर्गात सांगायचे असा एक गृहपाठ त्यांनी आम्हाला दिल्याचे मला आठवते. दुसऱ्या दिवशी वर्गात मुलांनी अनेक कोडी सांगितली आणि चुकत माकत त्यांची अचूक उत्तरेही दिली. “एवढुसा गडू, त्याले पाहून रडू” हे शेवटचे कोडे.(गडू म्हणजे गडवा, लोटा.) या कोड्याचे उत्तर होते, “कांदा”. जगदीश नावाचा एक मुलगा जागच्याजागीच चुळबुळत होता. “काय झालं बे तुले? मुताले जायचं काय?” तायडेगुरुजी म्हणाले. जगदीशने नकारार्थी मान डोलावली."मंग असा हालते डुलते काहून बाप्पा?" गुरुजींनी विचारले. जगदीश म्हणाला, “गुरुजी, मलेपन एक कोडं घालायचं.” “मंग इतका वेळ काहून चूप बसला? चल, घाल.” त्याचे कोडे होते, “एवढुसा गडू, टुरूटुरू हागते; त्याचा गू मोठा गोड लागते.” इतर मुलांना हसू आवरेना. “हसू नका बे पोट्ट्यांनो.” तायडेगुरु ओरडले;पण त्यांच्या ओरडण्यात जोर नव्हता. पण तेसुद्धा गालातल्या गालात हसत होते. “मास्टरजी, मैं बताता हूँ.” रामफेर म्हणाला. रामफेरच्या वडलांचे नाव दुर्जन. उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न असल्यामुळे ते कावेडी वाहायचे. “सांग.” तायडेगुरुजी म्हणाले. “आम.” रामफेरने उत्तर दिले. गुरुजींनी एका पिशवीतून दोन आंबे काढले आणि दोघांनाही बक्षीस म्हणून दिले. त्यावेळी आंब्यांचा सीझन जवळ जवळ संपत आला होता.

खामगावलाच तिसरी आणि चौथीतच काही विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत करायला सांगणारे, आठवडी परीक्षेत मुलांचे प्रश्न एकमेकांनी तपासायची जबाबदारी सोपवणारे, अक्षर चांगले कसे काढावे हे शिकवणारे, कविता पाठ करण्याचे महत्त्व सांगणारे, स्वातंत्र्यसैनिकांच्या गोष्टी सांगणारे, मुलांची वैयक्तिक स्वच्छता पाहणारे भारंबेगुरुजी आणि भालेरावबाई, अमरावतीच्या 'सायन्स कोअर' आणि शासकीय कलानिकेतन या सरकारी शाळांमध्ये माझ्याकडून सलग तीन वर्षे वार्षिक हस्तलिखित तयार करवून घेणाऱ्या देशपांडे आणि डांगेबाई, आठवीपर्यंतच चित्रकलेच्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा करवून घेणारे वानखेडेसर, प्रयोगशाळेतील साहित्य घरी घेऊन जायला परवानगी देणारे आणि स्वत:च्या शब्दांत नसलेले पाठ केलेले उत्तर अचूक असले तरी, “ध्वनी होतो, पण अर्थबोध होत नाही.” असे सांगणारे सरदेशमुखसर, माझ्या एका विनोदी निबंधावर “निबंध छान झाला आहे; पण आपण वसंत काळपांडे आहोत, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर नाहीत हे लक्षात ठेवावं. आपल्या शैलीतच लिहावं, नक्कल शेवटी नक्कलच असते.” असे सांगणारे माणिकचंद नेमासा कानेड या शिक्षकांनी आमच्या शालेय जीवनात आनंद निर्माण केला. त्या काळात माध्यमिक स्तरावर गणित आणि विज्ञान या विषयांतील statics, dynamics, trigonometry, co-ordinate geometry, solid geometry अशा विषयांवर मराठीत पुस्तके उपलब्ध नसायची. शिक्षकांच्या नोट्स परीक्षेपुरत्या उपयोगी असल्यातरी त्यामुळे पूर्ण समाधान व्हायचे नाही. त्यासाठी इंग्रजीमध्ये कोणती पुस्तके वाचायची हे काळवीटसर सांगायचे. मात्र ही पुस्तके वाचली की नाही हे ते कधी विचारायचे नाहीत. शाळा अगदीच छोटी असल्यामुळे शारीरिक शिक्षण शिकवणारे भैयासाहेब निम्बेकर यांच्याकडे ग्रंथालयाचासुद्धा चार्ज होता. ग्रंथालयात मात्र मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमधील सर्व विषयांची अनेक पुस्तके होती. निम्बेकरसरांनी ग्रंथालयाच्या किल्ल्याच माझ्याकडे सोपवल्या होत्या.

एम. एससी. झाल्यानंतर कोणते करीअर निवडायचे याबाबत माझ्या मनात मोठाच संभ्रम निर्माण झाला होता. त्यावेळचे विदर्भ महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख आणि माझे शिक्षक डॉ. करबेलकर यांच्या सल्ला शिरोधार्य मानून मी शाळाखात्यातलीच नोकरी स्वीकारली.

प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवडी-निवडी, गरजा वेगवेगळ्या असतात याची जाण असलेले; विद्यार्थ्यांच्या म्हणण्याला कान आणि वेळ दोन्ही देणारे, परंतु प्रयत्न मात्र विद्यार्थ्यांचेच असतील अशा वृत्तीने काम करणारे शिक्षक मला कायम मिळाले. आपल्या विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा त्यांना नेहमीच अभिमान वाटायचा; पण त्यांनी ते आपले श्रेय आहे हे कधी मानले नाही. त्यांच्यापैकी फक्त मला पहिलीला शिकवणारे महादेव पुंजाजी तायडे यांची मार्च २०१४मध्ये भेट झाल्यामुळे त्यांचे छायाचित्र माझ्याकडे आहे. तेच मी माझ्या सर्व शिक्षकांचे प्रतीक म्हणून दिले आहे.


नोकरीच्या काळात १९७२पासून २००८पर्यंत अनेक शिक्षक मला भेटले. बरेच जण त्यांच्या अडचणी घेऊन यायचे, तर काहींची भेट शाळा तपासणी किंवा शाळाभेटीच्या वेळी व्हायची. काहीजण आपण केलेले चांगले काम दाखवावे म्हणून किंवा स्वत:च्या काही चांगल्या कल्पना सांगायला भेटायचे. त्यांच्या संपर्कातून मला अनेक नवीन उपक्रम सुचले आणि काही मी अमलातसुद्धा आणले.

२००८मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर कुठेही नोकरी किंवा मानधन न स्वीकारता शिक्षणक्षेत्रातच काम सुरू ठेवले. आता काम करणाऱ्या काही शिक्षकांकडूनच मला बऱ्याचशा नव्या घडामोडी समजावून घ्याव्या लागतात. मला एखादी गोष्ट माहीत नसली तर ती समजावून देताना माझ्या मुलाला जसा आनंद होतो तोच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आणि स्वरात दिसून येतो. हे करताना आपण काही विशेष केले आहे ही भावनासुद्धा त्यांच्याकडे नसते.

आपल्या कामावर आणि विद्यार्थ्यांवर प्रेम करणाऱ्या नि:श्रेय वृत्तीने काम करणाऱ्या अशा शिक्षकांमुळेच माझे आयुष्य समृद्ध व्हायला मदत झाली. यात त्यांचे काही श्रेय होते ही त्यावेळी मला जाणीवही झाली नाही आणि आता त्यांना ते सांगायला खूप उशीर झाला आहे. आज शिक्षक दिनाच्या दिवशी माझे आयुष्य समृद्ध करणाऱ्या या शिक्षकांना विनम्र अभिवादन आणि आजही तशाच निष्ठेने काम करणाऱ्या शिक्षकांना मन:पूर्वक शुभेच्छा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा