शैक्षणिक धोरणाचा बागुलबुवा
महाराष्ट्र टाइम्स, दिनांक २२ नोव्हेंबर २०१५
- डॉ. वसंत काळपांडे
नव्यानेच सत्तेवर
आलेल्या केंद्र सरकारने नवे शैक्षणिक धोरण जाहीर करण्याचा निर्णय घेतला आणि एप्रिल
२०१५पासून राज्यांनी यांच्या स्तरावर गाव, तालुका, जिल्हा आणि राज्य या स्तरांवर
चर्चा आयोजित करण्यासाठी सूचना दिल्या. एप्रिल २०१५पासून या चर्चा आयोजित होणे
अपेक्षित होते. महाराष्ट्र राज्यातही अशा चर्चा एप्रिल ते नोव्हेंबर २०१५ या
कालावधीत आयोजित झाल्याचे महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव
सांगतात. ऑक्टोबर २०१५मध्ये या चर्चांचा गोषवारा इंटरनेटवर अपलोड केला
असल्याचेसुद्धा ते सांगतात. परंतु या चर्चांबद्दल एकही बातमी प्रसारमाध्यमांत आली
नव्हती. प्रसारमाध्यमे - विशेषत: इलेक्ट्रॉनिक माध्यमे बातम्यांच्या शोधामध्येच
असताना एवढ्या महत्वाच्या राज्यव्यापी विचारमंथनाकडे कोणाचेही लक्ष गेले नाही हे मोठे
आश्चर्यच आहे.
आजवरच्या इतिहासात
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या बाबतीत अशी चर्चा कधी झालीच नव्हती असा शालेय शिक्षण
विभागाचा दावा आहे. पण तो अतिशय पोकळ आहे. १९८६चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या
वेळी देशभर आयोजित झालेल्या व्यापक चर्चांमुळे सर्व देशातले वातावरण ढवळून निघाले
होते. त्यावेळी मी दिल्लीला चार वर्षांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि
प्रशिक्षण विश्वविद्यालय, NUEPA,
नवी दिल्ली या संस्थेत प्रतिनियुक्तीवर होतो. राष्ट्रीय
स्तरावर नवीन शैक्षणिक धोरणाचे काम या संस्थेकडेच दिले होते. माझी चार वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच मला महाराष्ट्र
शासनाने शैक्षणिक धोरणाच्या कामासाठी नोव्हेंबर १९८५मध्ये परत बोलावून घेतले. मी
परत बोलावून घेतले. मी परत येईपर्यंत राज्यस्तरावरच्या बहुतेक सर्व सभा संपल्या
होत्या. शिल्लक राहिल्या होत्या त्या स्टेकहोल्डर्सच्या सभा. पालक, महिला, युवक,
लोकप्रतिनिधी, उद्योजक, संस्थाचालक अशा विविध स्टेकहोल्डर्सचे प्रतिनिधी आणि
त्यांच्या संघटना यांच्या सर्व सभांच्या मी उपस्थित होतो. आलेल्या सर्व चर्चांच्या
आधारे मसुदा तयार करण्यासाठी तीन सदस्यांची एक मसुदा समिती नेमली होती. डॉ. राम
ताकवले, (दिवंगत) प्राचार्य पी. बी. पाटील आणि मी. जानेवारी १९८६मध्ये केंद्र
शासनाला पाठवायच्या शिफारशींचा मसुदा सर्व पक्षांच्या गटनेत्यांना दाखवला, त्यांचे
अभिप्राय घेतले, ते मंत्रिमंडळापुढे ठेवले आणि मंत्रिमंडळाच्या सूचनेनुसार फेरबदल
करून केंद्र शासनाला पाठवले. पक्षांच्या गटनेत्यांमध्ये मला राम कापसे, शरद पवार,
प्रभाकर संझगिरी यांची मला प्रकर्षाने आठवण होते. त्यावेळी “Riddles of Ramayana” या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्र
शासनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकामुळे महाराष्ट्रात वातावरण प्रचंड पेटले असूनही
महाराष्ट्राच्या सर्व वृत्तपत्रांनी नवीन शैक्षणिक धोरणाची मोठ्या प्रमाणावर दखल
घेतली होती. त्यावेळी इलेक्ट्रोनिक मिडीया नव्हता. मग यावेळी महाराष्ट्र शासनाने
एवढे प्रसिद्धिविन्मुख राहायचा निर्णय का घेतला?
१४ मुद्द्यांवरचे ४४
पानांत दिलेले हे मुद्दे जनतेच्या शिफारशी होत्या, राज्य शासनाचे अभिप्राय नव्हते.
याबद्दल वाद निर्माण झाल्यामुळे आता महाराष्ट्र शासनाने हा मसुदा वेबसाईटवरून
काढून टाकला आहे. या कोऱ्या पाटीवर २३ नोव्हेंबरपर्यंत अभिप्राय द्यायचे आहेत.
माझे अभिप्रायसुद्धा अशाच कोऱ्या पाटीवरचे आहेत. या संदर्भात मला तीन घटक
महत्त्वाचे वाटतात; विद्यार्थी, शिक्षक आणि शैक्षणिक प्रशासन.
पालक आपल्या मुलांना
शाळेत पाठवतात ते प्रामुख्याने ज्याला 3 R’s ,
म्हणजे वाचन, लेखन आणि गणित , त्यावर प्रभुत्व मिळावे यासाठी. कौशल्य विकास आणि
कला, क्रीडा, मूल्ये या गोष्टी त्यांच्या दृष्टीने व्हॅल्यू अॅडिशन. मुलांना खूप
मोठ्या प्रमाणावर एक्स्पोजर मिळेल यासाठी मोठ्या प्रमाणावर शासन स्तरावर प्रयत्न
व्हायला पाहिजेत. शहरी भागातल्या मुलांना जन्मापासूनच अक्षरांचे पर्यावरण असते.
लहानपणापासून जाहिराती, घराच्या नेमप्लेट्स, घरी येणारी वृत्तपत्रे, पुस्तके,
मासिके, दूरदर्शन संच त्यांच्याभोवती असते. त्यामुळे त्यांना वाचन सोपे जाते. ही
गॅप कशी भरून काढायची यासाठी भरीव स्वरूपाचा कृतिकार्यक्रम आवश्यक आहे. “कौशल्यविकास
= व्यवसाय शिक्षण/श्रमप्रतिष्ठा” या समीकरणामुळे लोक अशा कार्यक्रमांपासून
दुरावतात. खरे तर पूर्वप्राथमिक स्तरापासूनच कौशल्यविकासाला सुरवात व्हायला हवी.
स्वत:च्या गोष्टी स्वत: करण्यापासून ही सुरवात होते. नंतर भाषा, विज्ञान, गणित,
सामाजिक शास्त्रे यांच्याशी कौशल्यविकास कार्यक्रमाची सांगड घालावी लागेल. शब्द
आकारविल्हे. लावणे, भाषांतर, जाहिराती तयार करणे अशी अनेक कौशल्ये भाषेत घेता
येतील. एखादा प्रयोग कसा करायचा याचे लेखी वर्णन लिहिण्यापेक्षा प्रत्यक्ष प्रयोग
करणे जास्त महत्त्वाचे नाही का? एखाद्या प्लंबरला नळ दुरुस्त करण्याचे
प्रात्यक्षिक करण्याऐवजी त्याचे लेखी वर्णन करणे जास्त महत्त्वाचे मानण्यासारखा हा
प्रकार आहे. विज्ञानात विद्यार्थ्यांना काचेची चीप, चुंबक, आरसे, बिलोर अशा गोष्टी
प्रयोगांसाठी का देऊ शकत नाही? प्रयोगांच्या वेळी उपकरणे लावणे, त्यांची निगा आणि
देखरेख ठेवणे यांत विद्यार्थ्यांचा सहभाग का घ्यायचा नाही? कौशल्यविकास आणि मूल्ये
अभ्यासक्रमात्ल्या सर्व विषयांशी इंटिग्रेट करणे खूप महत्त्वाचे आहे.
ज्ञानरचनावादाचा
सध्या खूपच बोलबाला आहे. “विद्यार्थी शिक्षकांकडून, सहाध्यायांकडून स्वत:चे स्वत:
आणि येणाऱ्या अनुभवांतून शिकतो.” हे महाभारत कालापासून माहीत आहे. शिक्षण हक्क
कायद्यात अभ्यासक्रम कसा असावा याचे साधे सरळ वर्णन दिले आहे. रचनावाद या
संकल्पनेभोवती गूढ वलय तयार करून या क्षेत्रात काही लोकांची बुवाबाजी निर्माण झाली
आहे ती नष्ट केली पाहिजे.
पायाभूत चाचण्या
आणखी पारदर्शकपणे वापरायला हव्या. सध्या त्यांच्याभोवती संशयाचे वातावरण निर्माण
झाले आहे. असरच्या अहवालानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जावईशोध लागायला
सुरवात झाली. बालभारती आणि एससीईआटी या संस्थात समन्वय नसल्यामुळे शैक्षणिक स्तर
२०१०पासून ढाळायला सुरवात झाली असे एक अनुमान होते. जर हे खरे मानायचे असेल तर
२०१०पूर्वी शैक्षणिक स्तर का चांगला होता? कोणत्याही राज्यातली शिक्षण व्यवस्था
वर्षानुवर्षे उत्क्रांत होत असते. तिला अचानक टाकाऊ म्हणून नाकारणे यापेक्षा मोठी
चूक असूच शकत नाही. अनेक आयएएस अधिकारी हिंदी भाषिक राज्यांतून आलेले असतात. ते
त्या राज्यांच्या व्यवस्था इतर राज्यांवर लादायचा प्रयत्न करतात. शिक्षण मंत्री
विनोद तावडे हे आपल्या राज्याची पार्श्वभूमी, गरजा लक्षात घेऊन धोरणात आपल्यासाठी
जागा निर्माण करायला पाहिजे असे सांगत असतात. पण राज्यातले वरिष्ठ अधिकारी त्यांना
साथ देताना दिसत नाहीत.
‘संख्या, समता आणि
गुणवत्ता’ हा एक निसटता त्रिकोण आहे असे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक
म्हणायचे. त्रिकोणासाठी तीन बाजूंपैकी दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा
जास्त असावीच लागते, नाहीतर त्रिकोण तयार होऊच शकत नाही. आपंल्या शिक्षणव्यवस्थेत
अशीच परिस्थिती आहे. ग्रामीण-शहरी, अनुसूचित जाती-जमाती/इतर, एसएससी बोर्ड/इतर
बोर्ड्स, भारतीय भाषामाध्यमांच्या शाळा/इंग्रजी माध्यमाच्या शाळा,
अनुदानित/विनाअनुदानित, खासगी,जिल्हा परिषदा –नगरपरिषदा – महानगरपालिका यांच्या
शाळा/खासगी व्यवस्थापनाच्या शाळा अशी अनेक टोके आहेत. कॉमन स्कूल सिस्टीमबद्दल कोणी कितीही आग्रही
असले तरी ही व्यवस्था शक्य नाही; हे लक्षात घेऊन जिथे कमकुवत गटातली मुले शिकतात
त्या शाळांकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. तसेच फी घेणाऱ्या शाळांमध्ये
शिकणाऱ्या पालकांकडे दुर्लक्ष करणे हासुद्धा याचा व्यत्यास आहे हे विसरून चालणार
नाही.
शिक्षणाच्या
भाषामाध्यमाचा प्रश्न सर्वांच्याच जिव्हाळ्याचा आहे. पण इयत्ता पहिली ते
चौथीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेतूनच द्यावे अशी शिफारस एक दिवास्वप्नच आहे. कर्नाटक
सरकारविरुद्ध मी २०१४मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेल्या
निर्णयानुसार मुलांनी कोणत्या माध्यमातून शिकावे याबाबतचा निर्णय सर्वस्वी
त्यांच्या पालकांचाच आहे; शासनाला त्यात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करता येत
नाही.
शिफारशींची क्षेत्रे
तर अनेक आहेत. सर्वच क्षेत्रांवर भाष्य करणे शक्यही नाही. राष्ट्रीय शैक्षणिक
धोरणावर शिफारशी करणाऱ्या अनेक राज्यांपैकी एक राज्य आहे. या सर्व शिफारशी विचारात
घेऊन केंद्र सरकार धोरणाचा मसुदा तयार करेल. तो मंत्रिमंडळ, केंद्रीय शिक्षण
सल्लागार मंडळ आणि संसदेची दोन्ही सभागृहे या मार्गांनी मंजूर होईल. पण त्यानंतर
नवीन धोरणाच्या अंमलबजावणीचा कृतिकार्यक्रमसुद्धा त्या होईल हे पाहिले पाहिजे.